- कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर बौद्धभूमीच्या जागेसाठी जनआक्रोश मोर्चा ।
- भिख्खू गौतमरत्न महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली हजारोंचा जनसमुदाय हजर ।
कल्याण : वालधुनी येथील बुद्धमूर्तीची तोडफोड प्रकरणी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर बौद्धभूमी फाउंडेशन च्या वतीने जण आक्रोश मोर्चा काढण्यात आला. गेल्या दहा दिवसापासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसमोर बौद्ध भिक्खू संघ दे मदत धरणे आंदोलन करत आहे परंतु महापालिकेकडून अजूनही बौद्धभूमी फाउंडेशनच्या जागे संदर्भात निर्णय होत नसल्याने आज मोर्चाची हाक देण्यात आली होती. गौतमरत्न महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली हजारो बौद्ध अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते व फुले शाहू आंबेडकरी नागरिकांनी ‘विशाल जनआक्रोश महामोर्चा’ काढला. मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी निळे व पंचशील ध्वज फडकावत परिसर घोषणांनी दणाणून सोडला.
“बौद्धभूमी आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची!”, “संविधान वाचवा, बुद्धभूमी वाचवा!” अशा जोरदार घोषणा देत आपला विरोध दर्शवला यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभारून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले.
मोर्चेकरांच्या प्रमुख मागण्या.
१) खासदार श्रीकांत शिंदे यांनी बौद्ध मूर्ती तोडफोड प्रकरणी देशातील तमाम बौद्ध अनुयायांची जाहीर माफी मागून आपल्या खासदारपदाचा राजीनामा द्यावा.
२) श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे तथा उद्योजक अभिषेक घोरडे व त्यांच्या सर्व साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी.
३) आयुक्त अभिनव गोयल व उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे.
४) सातबारा उताऱ्यावर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची करण्यात आलेली खोटी नोंद तात्काळ रद्द करण्यात यावी. सदर जमिन बौद्धभूमी फाउंडेशनच्या नावे करावी.
५) बेकायदेशीर टीडीआर प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व महापालिका अधिकारी व भूमाफियांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
मोर्चामध्ये हजारो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त
सहभाग दिसून आला. आंदोलकांनी बौद्ध समाजाच्या हक्कासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात अधिक तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला. या मोर्चामध्ये बामसेफ प्रणित बुद्धिस्ट इंटरनॅशनल संघटना, भारत मुक्ती मोर्चा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट बहुजन मुक्ती पार्टी सह अनेक सामाजिक व राजकीय पक्षांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला ।
