ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि रविंद्र चव्हाण यांच्या राजकीय चाणक्यनीतीचा विजय ।

  • ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि रविंद्र चव्हाण यांच्या राजकीय चाणक्यनीतीचा विजय ।

ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पॅनल पद्धतीने झालेल्या निवडणुकीत केंद्रात आणि राज्यात सत्तेतील मित्रपक्ष असणाऱ्या भाजप आणि शिवसेनेचे शिलेदारच एकमेकांविरुद्ध लढत असल्याचे पाहायला मिळाले. अखेर या निवडणुकीत ‘परिवर्तन पॅनल’चा पराभव करत ‘सहकार पॅनल’ने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. वस्तुतः ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व आहे. बहुजन विकास आघाडीकडून या बँकेतील सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रविंद्र चव्हाण यांनी या निवडणुकीत राजकीय चाणक्यनीतीचा अवलंब केला. ठाणे जिल्हा मध्यवर्ती निवडणुकीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सहकार पॅनलच्या माध्यमातून शिंदेसेनेच्या काही उमेदवारांसोबतच आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वात भाजपचे काही उमेदवार उभे होते. तर त्यांच्या समोर उभ्या ठाकलेल्या ‘परिवर्तन पॅनल’मध्येही भाजपचे ४ तर शिंदेसेनेचे ३ उमेदवार उभे होते. दोन्ही पॅनलमध्ये आपले उमेदवार उभे करण्यामागे उमेदवार आणि कार्यकर्त्यांची संख्या जास्त असल्याचे कारण दोन्हीही नेत्यांकडून देण्यात आले होते. नुकत्याच लागलेल्या निकालात भाजपचे ८ तर शिंदेसेनेचे ५ उमेदवार निवडून आले आहेत. एकूण २१ जागांसाठी झालेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत बहुमतासाठी ११ उमेदवारांची गरज होती, मात्र महायुतीचे १३ उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे शिंदे-चव्हाणांची राजकीय चाणक्यनीती यशस्वी ठरल्याचे दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला या निकालातून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला धक्का बसला आहे.  आता ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सत्तेबाबतचा पुढील निर्णय महायुतीचे वरिष्ठ नेते म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत, अशी चर्चा आहे. ते या बँकेतील सत्तेच्या चाव्या महायुती म्हणून आपल्याकडे ठेवतात की बहुजन विकास आघाडीकडे सुपूर्द करतात हे पाहणे रंजक ठरेल ।