मूल्यप्रस्तावाधारित व्याघ्र संवर्धनासाठी शासन प्रयत्नशील : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ।

  • मूल्यप्रस्तावाधारित व्याघ्र संवर्धनासाठी शासन प्रयत्नशील : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ।
  • मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा ।

नागपूर : नैसर्गिक अधिवास कायम राखत वैज्ञानिक दृष्टीकोणातून राज्यात व्याघ्र संवर्धनाची अंमलबजावणी सुरू आहे. हे कार्य पुढे घेवून जाण्यासाठी नवी पंचसूत्री आखण्यात आली आहे. तसेच मुल्यप्रस्तावाधारित व्याघ्र संवर्धनासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे, प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या औचित्याने वन विभागाद्वारे येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेत (आयआयएम) आयोजित परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. वनमंत्री गणेश नाईक, शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी, वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) श्रीनीवास राव यांच्यासह कंबोडीया, भूतान आणि बांग्लादेशातील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वाघ हा नैसर्गिक अधिवास आणि अन्न साखळीचा केंद्रबिंदू आहे. त्यांच्या संवर्धनातून पर्यावरणाचे व वनांचे संरक्षण होते. म्हणूनच राज्यात वैज्ञानिक दृष्टीकोणातून व्याघ्र संवर्धन कार्य सुरू आहे. राज्यातील 6 व्याघ्र प्रकल्पांच्या कोअर भागांतून गावांचे स्थलांतरण करण्यात आले व नवीन बफर क्षेत्र तयार करण्यात आले. वनविभागाच्या नवीन धोरणामुळे व्याघ्र प्रकल्पाशेजारील गावकऱ्यांनी पुनर्वसन व स्थलांतरासाठी पुढाकार घेतला आहे. मानव वन्यजीव संघर्ष दूर करण्यासाठी व्याघ्र प्रकल्पालगत गावांमध्ये नियोजनबद्ध कार्यपद्धती आखण्यात आली आहे. व्याघ्र हालचालीसाठी कॅमेरा ट्रॅकिंग, एआय आधारित अर्ली वॉर्निंग सिस्टीम आदी उपाय योजना करण्यात आल्या आहेत. यामुळे वाघ, जैवविविधता आणि पर्यटन यांच्या संवर्धनासाठी नवी परिसंस्था उभी राहिली आहे. परिणामी 2014 मध्ये राज्यात असलेली वाघांची 190 ही संख्या वाढून 444 झाली आहे व नवीन वाघ गणनेत ही संख्या 600 च्या वर गेल्याचे चित्र दिसेल, असे त्यांनी सांगितले. जगातील व्याघ्र संख्येच्या 75 टक्के वाघ भारतात आहेत आणि भारतातील वाघांच्या संख्येत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे. गेल्या दोन दशकांपासून व्याघ्र संवर्धनासाठी उचलण्यात आलेल्या महत्वाच्या पाऊलांमुळे देशात वाघांच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या स्थानाकडे मार्गक्रमण करीत आहे. वाघांच्या अस्तित्वाचे महत्व समजून घेत त्याचा मानवाच्या चरितार्थ व अस्तित्वासोबत समन्वय करून मूल्यप्रस्तावाधारित व्याघ्र संवर्धनासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मानव वन्यजीव संघर्ष कमी करणे, व्याघ्र अधिवास हरित उपजिविका अभियान राबविणे, व्याघ्र संवर्धनासाठी सीएसआर निधी उपलब्ध करून देण्यासाठी सीएसआर धोरण आखणे, शाश्वत पर्यटन धोरण तयार करून रोजगार निर्मिती करणे आणि पर्यटन वाढवतांना वनसंरक्षण व संवर्धनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणे अशी व्याघ्र संवर्धनासाठी पंचसूत्री आखण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले ।