- कोकण विधान परिषद निवडणुकीत बाळ माने यांची माघार ।
रत्नागिरी : रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा घोडेबाजार होऊ नये आणि मतदान प्रक्रिया स्वच्छ व पारदर्शक वातावरणात पार पडावी, या भूमिकेतून आपण माघार घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बाळ माने म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी कोणत्याही दबावाशिवाय आणि प्रलोभनांना बळी न पडता मतदान करावे, ही आपली भूमिका आहे. त्यामुळे संभाव्य घोडेबाजाराला आळा घालण्यासाठी आपण निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.दरम्यान, या संपूर्ण घडामोडीत मंत्री नितेश राणे यांनी महत्त्वाची मध्यस्थी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यांच्या हस्तक्षेपानंतरच बाळ माने यांनी माघारीचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. बाळ माने यांच्या माघारीमुळे रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद निवडणुकीचे चित्र मोठ्या प्रमाणात बदलले असून, कोकणातील राजकीय समीकरणांनाही नवी दिशा मिळाल्याचे मानले जात आहे. या निर्णयामुळे आगामी निवडणुकीतील वातावरण अधिकच तापले असून, विविध राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे।
