- नांदेड, मंगळुरू, मुंबई ते कारगिल, अवघ्या पाच दिवसांत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा झंझावाती दौरा ।
- अखंड दौरे, जनसेवा आणि संघटन विस्ताराचा ध्यास
डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघातील विकासकामांसोबतच राज्यभरातील संघटन विस्तार, सामाजिक उपक्रम आणि राष्ट्रीय बांधिलकी या तिन्ही आघाड्यांवर सातत्याने सक्रिय असलेले खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी अवघ्या पाच दिवसांत महाराष्ट्र, कर्नाटक आणि केंद्रशासित लडाख असा धावता दौरा पूर्ण करत जनसेवा आणि पक्षकार्याचा वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. नांदेड, मंगळुरू, मुंबई आणि कारगिल असा सलग प्रवास करत विविध कार्यक्रमांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला. १ जुलै रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यापासून या दौऱ्याची सुरुवात झाली. किनवट येथे आयोजित महाआरोग्य सर्वरोग निदान शिबिर आणि रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थित राहत त्यांनी ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले. उमरखेड येथे आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात शिवसैनिकांशी संवाद साधत संघटन अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. राज्य सरकारच्या जनहिताच्या योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्यासोबतच प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेशी सातत्याने संपर्क ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. याच दौऱ्यात माहूरगडावरील श्री रेणुका माता आणि श्री दत्तशिखर येथे दर्शन घेऊन राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी तसेच शेतकऱ्यांच्या भरघोस पीकासाठी प्रार्थनाही केली. नांदेड दौरा पूर्ण होताच २ जुलै रोजी ते कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडुशेड्डे येथे पोहोचले. सुमारे चारशे वर्षांची परंपरा लाभलेल्या श्री शेड्डे श्री विष्णुमूर्ती मंदिराच्या भव्य पुनर्विकासाच्या भूमिपूजन सोहळ्याला त्यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक नात्याचा उल्लेख करत भारतीय संस्कृतीची एकात्मता अधोरेखित केली. मंगळुरू येथील कार्यक्रम आटोपताच ३ जुलै रोजी रात्री उशिरा मुंबईत आयोजित शिवसेनेच्या महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश सोहळ्यात त्यांनी सहभाग घेतला. उत्तर महाराष्ट्रातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षावर विश्वास व्यक्त केला. नव्याने पक्षात दाखल झालेल्या सर्वांचे स्वागत करत त्यांनी शिवसेनेची संघटनात्मक ताकद दिवसेंदिवस वाढत असल्याचा विश्वास व्यक्त केला. मुंबईतील कार्यक्रम संपल्यानंतर विश्रांती न घेता ४ जुलै रोजी पहाटेच ते कारगिलसाठी रवाना झाले. ५ जुलै रोजी भारतीय सैन्य आणि सरहद फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने द्रास येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सरहद शौर्यथॉन’मध्ये त्यांनी सहभाग घेतला. देशभरातून आलेल्या हजारो धावपटूंच्या उपस्थितीत शौर्यथॉनला हिरवा झेंडा दाखवत भारतीय सैन्याच्या शौर्य, त्याग आणि बलिदानाला मानवंदना अर्पण केली. त्यानंतर कारगिल वॉर मेमोरियल येथे पुष्पचक्र अर्पण करून ऑपरेशन विजयमधील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. याच दौऱ्यात द्रास उपजिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन आणि नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. काही महिन्यांपूर्वी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या आरोग्य सुविधांच्या मागणीची पूर्तता झाल्याने द्रास आणि परिसरातील नागरिकांना आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहेत. दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्यसेवा अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना शिवसेना आणि जम्मू-काश्मीरचे नाते हे विश्वास, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीवर आधारित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अवघ्या पाच दिवसांत नांदेड, मंगळुरू, मुंबई आणि कारगिल असा हजारो किलोमीटरचा दौरा पूर्ण करत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संघटन विस्तार, धार्मिक-सामाजिक बांधिलकी, आरोग्य सेवा, राष्ट्रीय एकात्मता आणि जनसंपर्क या सर्व आघाड्यांवर सक्रिय उपस्थिती नोंदवली. सातत्याने जनतेमध्ये राहून विकासकामांना गती देणे, कार्यकर्त्यांशी संवाद राखणे आणि समाजहिताच्या उपक्रमांना चालना देणे, हीच आपल्या सार्वजनिक जीवनाची कार्यपद्धती असल्याचे त्यांच्या या धावत्या दौऱ्यातून पुन्हा अधोरेखित झाले आहे ।
