पोलीस दलावर शोककळा,रत्नागिरीचे तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांचे निधन ।

  • पोलीस दलावर शोककळा,रत्नागिरीचे तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांचे निधन ।

रत्नागिरी : राज्य राखीव पोलीस दलाचे (SRPF) दौंड येथील समादेशक (कमांडंट) तथा अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांचे आज,रविवारी (७ जून) पुण्यात उपचारादरम्यान निधन झाले.ते ४५ वर्षांचे होते. त्यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ उडाली असून सर्वत्र मोठी हळहळ व्यक्त होत आहे. त्यांनी रत्नागिरीत अप्पर पोलिस अधीक्षक पदाचा कार्यभार सांभाळला होता. रत्नागिरीतील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यात, विविध गुन्ह्यांचा तपास लावण्यात आणि स्थानिक प्रशासनात महत्त्वाची भूमिका घेतली होती. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे ते पोलीस दलात आणि स्थानिक जनतेतही परिचयाचे होते. रत्नागिरीतील यशस्वी कार्यकाळानंतर त्यांची बदली दौंड येथील राज्य राखीव पोलीस दल (SRPF) गट क्रमांक ५ च्या समादेशक (Commandant) पदावर झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी तुषार पाटील यांना अचानक रक्ताची उलटी झाली होती. त्यामुळे त्यांना तातडीने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.मात्र उपचारादरम्यान ते कोमात गेले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु आज त्यांची प्राणज्योत मालवली. सुमारे आठ वर्षांपूर्वी पाटील यांच्यावर किडनी प्रत्यारोपण (किडनी ट्रान्सप्लांट) शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळी त्यांच्या वडिलांनीच त्यांना किडनी दान केली होती.

  •  कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख 

तुषार पाटील हे पोलीस दलातील अत्यंत अभ्यासू, संयमी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जात होते.यापूर्वी त्यांनी कोल्हापूर येथे शहर पोलीस उपअधीक्षक (DYSP) म्हणून अत्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. कोल्हापूरकरांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय अधिकारी होते. सुमारे सहा महिन्यांपूर्वीच त्यांची पदोन्नतीने दौंड येथील ‘एसआरपीएफ’ गट क्रमांक ५ च्या समादेशक (अपर पोलीस अधीक्षक) पदावर नियुक्ती झाली होती. अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या मूळ गावी नेण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील ‘जामनेर’ या त्यांच्या मूळ गावी उद्या, सोमवार दिनांक ८ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे ।